नाशिक जिल्ह्यातील १३ स्मारकांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजनातून ३ टक्के निधी देण्यात येणार आहे. एकंदरीत यासाठी २० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सरकारवाडा, सुंदरनारायण मंदिर, स्वातंत्र्यवीर सावरकर वाडा (भगूर), तातोबा मंदिर (ओढा), नारोशंकर मंदिर यांसारख्या १३ स्मारकांचा ठेवा चांगल्या स्थितीत उतरणार आहे.
नाशिक जिल्ह्यात किल्ल्यांची संख्या मोठी आहे. मात्र, या किल्ल्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळत नसल्याचे तेथील प्राचिन बांधकामाची वाताहत होत आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आता जिल्हा
नियोजन समितीच्या तीन टक्के निधीतून किल्ले जतन व दुरुस्तीला निधी मिळणार असल्याने पुरातत्त्व विभागाने मिळणार आहे. जिल्ह्यातील साल्हेर, मुल्हेर, अंकाई या तीन किल्ल्यांचे जतन करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागाने या आर्थिक वर्षात नाशिक जिल्ह्यातील प्राचिन व ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिक शहर व जिल्ह्यातील १३ वास्तूंचे जतन व दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने जिल्हा वार्षिक योजनेतील सर्वसाधारण योजनेतून ३ टक्के निधी हा पुरातत्त्व विभागाला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून किल्ले, ऐतिहासिक व प्राचिन वास्तूंचे काम केले जाणार आहे.
नाशिक जिल्हा नियोजन समितीला या आर्थिक वर्षात सर्वसाधारण योजनेतून ६८० कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. या निधीच्या ३ टक्के म्हणजे जवळपास २०.४० कोटी रुपये निधी पुरातत्त्व विभागाला प्राप्त होणार आहे. या स्मारकांच्या जतनासाठी विभागाच्या पॅनलमध्ये नोंदणी असलेल्या व अनुभवी वास्तुविशारदांकडून प्रस्तावांसाठी दरपत्रक मागविले जाणार आहेत. या दरपत्रकानुसार वास्तुविशारदांची नियुक्ती करून संबंधित स्मारकांचे जतन व दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.
या स्मारकांचे होणार जतन आणि दुरुस्ती
सरकारवाडा, सुंदरनारायण मंदिर, स्वातंत्र्यवीर सावरकर वाडा (भगूर), तातोबा मंदिर (ओढा), नारोशंकर मंदिर, महादेव मंदिर (देवळाणा), मुल्हेर किल्ला (मुल्हेर), साल्हेर किल्ला (साल्हेर), होळकर वाडा (चांदवड), विष्णू मंदिर (घोडांबे), वैजेश्वर मंदिर (वावी), मुक्तेश्वर महादेव मंदिर (सिन्नर), अंकाई किल्ला (येवला).












