loader image
[ays_poll id=7]

के आर टी शाळेत ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा

Aug 15, 2023


कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अॅण्ड ज्यु. कॉलेज, मनमाड येथे ७७ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या परंपरेनुसार इयत्ता १० वी मध्ये शाळेत प्रथम येणा-या विदयार्थ्यांच्या पालकांच्या हस्ते दरवर्षी १५ ऑगस्टला ध्वजारोहण करण्यात येते. मार्च २०२३ मध्ये कु. ब्राम्ही सयाजी गायकवाड ही विदयार्थिनी ९६.२०% मार्क घेवून शाळेत प्रथम व मनमाड केंद्रात दुसरी आल्याने कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तिचे पालक श्री. सयाजी गायकवाड आणि सौ. शोभा गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण प्रसंगी राष्ट्रगीत आणि राज्यगीत सादर करण्यात आले. ध्वजारोहणानंतर झालेल्या परेडमधून चारही हाउसच्या कॅप्टन, व्हाईस कॅप्टन व त्यांच्या पथकाने राष्ट्रध्वजास सलामी दिली.

प्रमुख पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक प्राचार्य मुकेश मिसर यांनी केला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. सयाजी गायकवाड यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ध्येय नेहमी मोठे ठेवावे, विदयार्थ्यांनी भव्य स्वप्न पहावे आणि ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी संघर्ष करावा. तर सौ. शोभा गायकवाड यांनी सांगितले की, माझ्या मुलीने कुठलाही क्लास न लावता केवळ शाळेच्या मार्गदर्शना बळावर उत्तुंग यश मिळविले आहे. हा शाळेतील शिक्षकांच्या मेहनतीवर असलेल्या विश्वासाचे प्रतिक आहे.

शाळेच्या परंपरेप्रमाणे पहिल्या तीन विदयार्थ्यांचा सन्मानचिन्ह आणि गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला. शाळेतील विषयशिक्षकांकडून आपापल्या विषयात प्रथम येणा-या विदयार्थ्यांस स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले. संस्थेच्यावतीने दरवर्षी देण्यात येणा-या मिलिंद गुणवत्ता शिष्यवृत्ती अंतर्गत याही वर्षी मागील लाभार्थी वेदांत नरेंद्र जोशी, कु. धनश्री बाळू घुगे आणि कु. मृणाल प्रदिप संसारे या विदयार्थ्यांना संस्थेच्यावतीने शिष्यवृत्तीचे धनादेश प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. विदयार्थ्यांमध्ये गुणवत्तावाढीस प्रेरणा मिळावी म्हणून शाळेचे हितचिंतक श्री. शरद जगताप यांचेकडून प्रथम पाच विदयार्थ्यांना सन्मानचिन्ह व रोख रक्कमेचे पारितोषिक व श्री. सुधाकर गरूड यांचेकडून प्रथम तीन विदयार्थ्यांना सन्मानचिन्ह व रोख रकमेचे पारितोषिक तर सौ. शोभाबाई लहानू संसारे यांचेकडून प्रथम तीन विदयार्थ्यांना रोख रकमेचे पारितोषिक उपस्थित पाहूणे व संस्था पदाधिका-यांच्या हस्ते देवून गौरविण्यात आले. विदयार्थी गुणगौरव व सुत्रसंचलन सौ. संगिता कदम यांनी केले.

याप्रसंगी श्रेया गंगेले, पुजा नाईकवाडे, ओम सांगळे, चारूस्मिता सोनवणे इ. विदयार्थ्यांची भाषणे झाली तर सांस्कृतिक कार्यक्रमात प्रज्ञेश आहिरे या विदयार्थ्याने बासरीवादन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले तर इ. ६ वी च्या विदयार्थिंनींनी ‘हि मायभूमी हे’ गीत सादर केले. इयत्ता ७ वी ते ९ वी च्या विदयार्थिंनींनी सादर केलेले लेझिम नृत्याने उपस्थितांना ठेका धरायला लावला. इ.४ थीच्या आयांका देवरे, शुभ्रा पितृभक्त, अमृता विंचू, सिध्देश भंडारी, आरोही बोरणारे, प्रणिल व्यवहारे यांनी अनुक्रमे लोकमान्य टिळक, भारतमाता, झाशीची राणी, पं. जवाहरलाल नेहरू, काशीबाई बाजीराव आणि भगतसिंग यांच्या वेशभुषा सादर केल्या.

कार्यक्रमास संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री. वैभव कुलकर्णी, श्री. दिपक व्यवहारे, धनंजय निंभोरकर, किशोर माळी, मनोज छाबडा, तुषार चौधरी, डॉ. प्रदिप साळी, श्री. गणेश लहाने यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु. हर्षदा कुदळे व कु. सृष्टी सांगळे या विदयार्थींनींनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी इयत्ता दहावी प्रथम तीन क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आपल्या जडणघडणीमध्ये शाळेचे अतुलनीय योगदान आहे तसेच उपस्थित विद्यार्थ्यांनी देखील भविष्यात आपले उत्तुंग ध्येय प्राप्तीसाठी सदैव नियोजनपूर्वक अभ्यास व संघर्ष करण्याची तयारी ठेवावी यश अपयशाची तमा न बाळगता आपण निवडलेले ध्येय गाठण्यासाठी सदैव तत्पर राहावे असे आवाहन केले.

या कार्यक्रमाला माजी विदयार्थी व पालकांची कुटूंबियांसोबत उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमने करण्यात आली.


अजून बातम्या वाचा..

.