मनमाड : येवल्यातील प्रसिद्ध मुक्तीभूमी येथील धर्मांतर घोषणेला यंदा ८४ वर्षे पूर्ण होत असून, येत्या १३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने येणार आहेत. त्याकरिता मनमाड आगारातून जादा बसेस सोडण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने केली होती. यासंदर्भात आगारप्रमुखांना निवेदनही देण्यात आले होते. मनमाड हे रेल्वेचे जंक्शन स्थानक आहे. त्यामुळे दूरवरून बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने रेल्वेने येऊन येथून बसमार्गे येवला येथे जात असतात. त्यांची येण्या-जाण्याची गैरसोय होऊ नये, याकरिता मनमाड येथून येवल्याच्या मुक्तीभूमी येथे जाण्याकरिता स्वतंत्र जादा बसेस सोडण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली होती. जादा बसेसचे नियोजन केल्याबद्दल जनतेला माहिती द्यावी, जेणेकरुन महामंडळाचेदेखील उत्पन्न वाढेल व नागरिकांची गैरसोय टळण्यास मदत होईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले होते. यावेळी मनमाड शहर सचिव अॅड. प्रमोद आहिरे, युवक नांदगाव तालुकाध्यक्ष गुरुकुमार निकाळे आदींसह रिपाइंचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देत आगार प्रमुखांनी तत्काळ १२ गाड्यांचे नियोजन केले असून रिपाई च्या मागणीची तत्काळ दखल घेऊन गाड्या उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.








