नांदगाव : मारुती जगधने
नांदगाव शहरा करिता स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचे कार्यारंभ आदेश नांदगाव नगर परिषदेतर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे.
नांदगाव नगर परिषदेचे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान योजनेअंतर्गत सदर योजना राबवली जाणार आहे.
५० कोटी रुपये निधी मंजूर असलेल्या या योजनेअंतर्गत नांदगाव शहरात नविन जलकुंभ व जलशुद्धीकरण केंद्र ही उभारण्यात येणार असुन शहराची २०४१ पर्यंत वाढणारी लोकसंख्या लक्षात घेवून योजना प्रस्तावित करण्यात आली आहे.
नांदगावकर माता भगिनींनी माझ्यावर विश्वास ठेवून आशीर्वाद देऊन मला आमदार केले असल्याने त्यांच्या प्रमुख अडचणी दूर करणार असल्याचे आश्वासन प्रत्येक वेळी आमदार सुहास कांदे यांनी दिले व त्यादृष्टीने प्रयत्न करत नांदगाव शहराचा मुख्य पाणी प्रश्न सोडवण्याच्या दिशेने मोठा टप्पा पार केला आहे. नांदगाव शहरासाठी स्वतंत्र पाणी योजना प्रस्तावित करून सरकारकडून ती मंजूर करून घेतली असुन आज कार्यारंभ आदेशही प्राप्त झाले आहे.
नांदगावकर माता भगिनी व व्यापारी बांधवांना ही मोठी आनंदाची बातमी आहे, कारण पंधरा ते वीस दिवस नांदगाव शहरात पाणी येत नसल्याने महिला वर्गाची मोठी अडचण होत होती, तसेच लहान मोठ्या व्यापाऱ्यांना पाण्याची गरज लक्षात घेता या योजनेमुळे शहरातील या अनेक समस्या सुटणार असून शहराच्या विकासाला देखील चालना मिळणार आहे.












