आज निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. त्यासोबतच आजपासून आचारसंहिता देखील लागू झाली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमणे एकूण 7 टप्प्यात देशभरात लोकसभेसाठी मतदान होणार असून, 19 एप्रिलला मतदानाचा पहिला टप्पा पार पडणार आहे.
निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार एकूण सात टप्प्यांमध्ये लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिला मतदान होणार आहे. दुसरा टप्पा – 26 एप्रिल, तिसरा टप्पा – 7 मे, चौथा टप्पा – 13 मे, पाचवा टप्पा – 20 मे, सहावा टप्पा – 25 मे आणि सातवा टप्प्यासाठी 1 जूनला मतदान होणार आहे. तर चार जून रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात मतदान होणार आहे. 19 एप्रिलला महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात मतदान होईल.
निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटलं की, देशभरात एकूण 97 कोटी मतदार आहेत. ही निवडणूक म्हणजे आमच्यासाठी ऐतिहासिक संधी आहे. आम्ही जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी राजकिय पक्ष यांच्याशी संवाद साधला आहे. ही निवडणूक निःपक्ष पणे होईल. प्रत्येक निवडणूक ही एक परीक्षा असते.
आदर्श आचारसंहितेत या गोष्टींना बंदी
1. सार्वजनिक उद्घाटन, पायाभरणी समारंभ 2. नवीन कामे स्वीकारणे 3. शासनाच्या कामगिरीचे होर्डिंग्ज लावता येणार नाही 4. संबंधित मतदारसंघात कोणताही शासकीय दौरा होणार नाही. 5. सरकारी वाहनांमध्ये सायरन लावले जाणार नाहीत. 6. शासनाचे यश दर्शविणारे होर्डिंग काढले जातील. 7. सरकारी इमारतींमध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री, राजकीय व्यक्तींचे फोटो लावण्यास बंदी असेल. 8. सरकारच्या उपलब्धी असलेल्या मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि इतर माध्यमांमध्ये जाहिरात करता येणार नाही. 9. कोणत्याही प्रकारची लाच किंवा प्रलोभन टाळा. देऊ नका, घेऊ नका. 10. सोशल मीडियावर पोस्ट करताना विशेष काळजी घ्या. तुरुंगात जायला तुमची एक पोस्ट पुरेशी आहे. त्यामुळे कोणताही संदेश शेअर करण्यापूर्वी किंवा लिहिण्यापूर्वी आचारसंहितेचे नियम काळजीपूर्वक वाचा.












