मनमाड : योगेश म्हस्के मनमाड शहरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
इ.स. १४५९ च्या सुमारास (माघ वद्य १, शके १३८०)श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ह्यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैल यात्रेचे निमित्त साधून ते कर्दळीवनात अदृश्य झाले. ह्या कर्दळी वनात सुमारे ३०० वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ निर्माण केले. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूडतोडया त्याच कर्दळीवनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुर्हाड निसटली व ती वारूळावर पडली. उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते. कुर्हाड वारूळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक आजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली; तेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज होत असे मानले जाते.
सबसे बडा गुरू, गुरूसे बडा गुरू का ध्यास, और उससे भी बडे श्री स्वामी समर्थ महाराज! तसेच स्वामी महाराजांनी त्यांच्या भक्तांना अभयदान दिले, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे! अशा शब्दांंमधे स्वामी समर्थांंची महती वर्णन केली जाते.इसवी सन १८५६ मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला व तिथल्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. येथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले.
शहरातील दत्त मंदिर येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्रामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते , सकाळी राकेश ललवाणी यांच्या हस्ते महाआरती करण्यात येऊन , श्री स्वामी समर्थ साराअमृत ग्रंथाचे वाचन करून भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील श्री स्वामी समर्थ मंदिर येथे देखील प्रगट दिनानिमित्त मंदिराला आकर्षक सजावट करून भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
या दोन्ही ठिकाणी श्री स्वामी समर्थ भक्त परिवार , श्री स्वामी सेवक आणि शहरातील भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.