मनमाड : योगेश म्हस्के ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’, हे वचन ऐकल्यावर डोळ्यासमोर जी मुर्ती उभी राहते ती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज अर्थात अक्कलकोट स्वामी यांची.
श्रीपाद वल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार आहेत. पौराणिक आधारानुसार, चैत्र शुद्ध द्वितीया हा दिवस श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन म्हणून ओळखला जातो. तर स्वामींनी चैत्र वद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील ‘वटवृक्ष समाधी मठ स्थानी’ माध्याह्न समयी आपल्या अवतारकार्याची समाप्ती केली , असे मानले जाते. आज श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी आहे. इ.स. 1459 मध्ये, माघ वद्य 1, शके 1380 या दिवशी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैल यात्रेचे निमित्त साधून ते कर्दळीवनात अदृश्य झाले. त्त्यानंतर 300 वर्षानंतर अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले. पुढे स्वामींनी अनेकांना आपल्या अवतार कार्याची प्रचिती देऊन इसवी सन 1878 मध्ये त्यांचा एक आविष्कार संपविला.
मनमाड येथील दत्त मंदिर परिसरात असणाऱ्या दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्रामध्ये श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्ताने दिनांक 30 एप्रिल ते 6 मे या सात दिवस अखंड नाम ,जप , प्रहारे , यज्ञ , श्री गुरुचरित्र , श्री स्वामी चरित्र ग्रंथाचे पारायण आदी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अक्कलकोट स्वामी समर्थांच्या समाधी दिनानिमित्त येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात आयोजित सप्ताहाचा समारोप आज करण्यात आला, यावेळी दुग्धाभिषेक, पूजा, पारायणसमाप्ती, होम हवन, विष्णुसहस्त्रनाम , महाआरती व महाप्रसादाचा लाभ दत्त मंदिर प्रांगणात हजारो भाविकांनी घेतला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील समर्थ मंदिरातही श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, येथे देखील भाविकांनी महाप्रसादाचा आणि स्वामी दर्शनाचा लाभ घेतला.