मनमाड : मालेगाव तालुक्यातील अजंग येथे (दि. १४ मे) रोजी अल्पवयीन मुलगी भाविका (रिया) ज्ञानेश्वर महाले (वय ८ वर्ष) हीचे घरातून अपहरण झाले होते. याबाबत पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलीसांनी शोध घेतला आणि (दि. १५ मे) रोजी तिचा मृतदेह गावाजवळील मोसम नदीपात्रालगत असलेल्या विहीरीत संशयास्पदरित्या आढळुन आला. त्यामुळे या बालिकेची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत संतप्त नातेवाईकांसह ग्रामस्थांनी रास्ता रोको केले. दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता.
मंत्री भुसे यांनी शब्द पाळत
पोलीसांनी या घटनेचा तपास करत या प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे. तरी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बालिकेच्या कुटुंबास न्याय मिळावा म्हणुन या घटनेची सुनावणी ही फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात यावी अशी मागणी मंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी विधी व न्याय विभागाला आदेश दिले असून हा खटला आता फास्टट्रॅक कोर्टात चालणार आहे. यामुळे मृत मुलीच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याचा आपला शब्द मंत्री भुसे यांनी पाळला आहे.
वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलीच्या वडिलांच्या पुरवणी जबाबावरून या प्रकरणी अपहरण करून तिचा खून व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह विहिरीत टाकल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आठ वर्षीय मुलीचा खून झाल्याने अजंग-वडेलसह तालुक्यातील ग्रामस्थांच्या भावना तीव्र होत्या.
मंत्री दादा भुसे यांनी दिले होती हमी
सलग दोन दिवस नामपूर रस्त्यावर रास्तारोको आंदोलन देखील गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले होते. संशयितांना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिकाही कुटुंबीय व ग्रामस्थांनी घेतली होती. यावेळी मंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून मुलीच्या नातेवाईकांशी बोलणे करून दिले आणि न्याय मिळवून देण्याची हमी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी सात दिवसात या गुन्ह्याचा छडा लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबले होते.