
नांदगाव विधानसभा मतदार संघात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आमदार सुहास कांदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच कृषी मंत्री यांना तात्काळ दुष्काळ जाहीर करत विविध उपयोजना करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.
नांदगाव विधानसभा मतदारसंघातील नांदगांव व मालेगांव तालुक्यांमध्ये चालू वर्षी २०२६ मध्ये पावसाने पाठ फिरविल्याने भयंकर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मतदार संघातील जवळपास १००% गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, जनतेसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. मतदार संघातील अनेक गावांमधील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी, बोअरवेल, तलाव पूर्णपणे कोरडे पडले आहेत. महिलांना २ ते ३ किलोमीटर पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. पाण्या अभावी जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न अतिशय गंभीर झाला असुन शेतकऱ्यांना जनावरे विकण्याची वेळ आली आहे. त्यासाठी तात्काळ चारा छावण्या व चारा डेपो सुरु करणे गरजेचे आहे. खरीप पिके पूर्णपणे वाया गेली असुन रब्बी हंगाम देखील धोक्यात आहे. विहिरींना पाणी नसल्याने शेतीला पाणी देता येत नाही. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आहे. शेती पीक कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांची लवकरात लवकर यादी जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केल्यास शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करण्यास मदत होणार आहे. तसेच दुष्काळग्रस्त गावांमध्ये मनरेगा (MGNREGA) ची कामे मोठ्या प्रमाणात सुरु करून रोजगार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नवीन टैंकर मंजूर करून जुन्या पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे.
तरी, आपण स्वतः या विषयात लक्ष घालून नांदगाव विधानसभा मतदार संघाला तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करून वरील सर्व उपाययोजना तातडीने लागू कराव्यात, अशी विनंती आ. कांदे यांनी पत्रातून केली आहे.











