मनमाड शहर आणि ग्रामीण भागाला जोडणारा आणि आनंदवाडीतून जाणारा रेल्वे अंडरपास नागरिकांसाठी असून अडचण आणि नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या संततधारेमुळे या अंडर पास मध्ये पाणी साचल्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

अंडर पास मध्ये पाणी साचल्यामुळे शहर व ग्रामीण भागाचा संपर्क तुटला आहे. शहरात येण्यासाठी दुसरा रस्ताच नसल्याने ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून रेल्वे रुळावरून वाहने उचलून ये-जा करावी लागत आहे.वाहतूक कुठून करायची असा संतप्त सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. अनेक वर्षाचा वहिवाटी रस्ता रेल्वेने खुला करावा, फाटक रस्ता पुन्हा सुरू करावा, नाहीतर रेल्वे रुळावरून पूल उभारावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पुलाखाली जमा होणाऱ्या पाण्याची विल्हेवाट लावण्याची सुविधा नाही, त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी पावसाळ्यात बंदच असतो. याचाच परिणाम ग्रामस्थांना आपला जीव धोक्यात घालून आपल्या दुचाकी रेल्वे रुळावरून उचलून दुसर्या बाजूला आणाव्या लागत आहेत. रेल्वे विभाग दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांत तीव्र असंतोष आहे. याबाबत रेल्वे विभागाने लक्ष घालून ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देखील स्थानिक नागरिकांनी दिला आहे.









