दिवाळी सण आला कि ग्रामीण भागातून शहरात रोजगारासाठी आलेल्या ग्रामीण भागातील जनतेसाठी घरी जाण्यासाठीचा उत्सव. हा उत्सव देशात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो परंतु यावर्षी घरी परतणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागू शकतो. ग्रामीण भागाची लाईफलाईन म्हणून ओळख असलेली लालपरीच्या कर्मचार्यांनी संपाचा इशारा दिला आहे.
महामंडळाचा सरकारी सेवेत समावेश करा अशी मागणी करीत 17 कामगार संघटनांच्या कृती समितीने संपाची हाक देत तारीख लवकरच जाहीर करण्याची माहिती दिली आहे. एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप करत ‘समान काम समान दाम’ या न्यायाने वेतनश्रेणी लागू करावी, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटनेने विभागीय कार्यालयांवर निदर्शने केली. यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी संप पुकारण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
कर्मचार्यांना या महिन्यापासून 28 टक्के महागाई भत्ता लागू असला तरी एसटी महामंडळाने 12 टक्यानंतर आजपर्यंत महागाई भत्त्यामध्ये वाढ केलेली नाही. त्यामुळे दिवाळी पूर्वी थकीत महागाई भत्ता आणि ऑक्टोबर महिन्याचे वेतन देण्याची मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी मागणी केली आहे.











