कोरोना महामारीमुळे प्रलंबित राज्यात निवडणुकीचा हंगाम जवळ येत आहे, तसतसा त्यातील सस्पेन्स अधिकच वाढत आहे. आता राज्य सरकार बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू केल्यावर मुंबई महापालिका वगळता अन्य महानगरपालिका आणि नगरपालिकांमधील नगरसेवकांच्या सदस्य संख्येत 15 टक्के वाढ करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. त्यासाठी हालचाली देखील सुरु करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पुढील आठवड्यात होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय होण्याची चिन्हे आहेत. महापालिका निवडणुका आता तोंडावर आहेत, त्यापूर्वी ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. पण मुंबई महापालिकेत नगरसेवक वाढविण्याला शिवसेना तयार नसल्यची माहिती समोर येत आहे, यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची काय भूमिका राहणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.
राज्यात मुंबईसह सध्या 27 महापालिका आणि 379 नगरपालिका- नगरपंचायती आहेत. दर १० वर्षांनी होणाऱ्या जनगणनेच्या आधारे नगरविकास विभागातर्फे महापालिका- नगरपालिकांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य संख्या निश्चित केली जाते. त्यानुसार राज्य निवडणूक आयोग त्या शहरासाठी प्रभाग रचना करून त्याप्रमाणे निवडणुक पार पाडते. पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चदरम्यान 15 महापालिकांच्या तसेच सुमारे 100 हून अधिक नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत.
राज्य सरकारच्या प्रस्तावित अध्यादेशाच्या माध्यमातून महापालिका कायद्यात सुधारणा करुन सदस्यवाढ करण्यात येणार असून त्याबाबतचा प्रस्ताव येत्या मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.











