महाराष्ट्रात दिवाळी मध्ये घरगुती किल्ला बनवणे ही अनेक वर्षांपासून चालत असणारी परंपरा आहे. सध्याच्या डिजिटल युगात ही परंपरा काही प्रमाणात मागे पडत असताना दिसत आहे. दिवाळीतील हीच परंपरा जपण्याचे काम हे मनमाड येथील चव्हाण कुटुंब दरवर्षी करत असतात.
मनमाड येथील सिव्हिल इंजिनिअर विक्रम चव्हाण आणि अमर चव्हाण हे गेल्या पाच ते सहा वर्षांपासून दिवाळी मध्ये महाराष्ट्रातील आपल्या शौर्याचा इतिहास सांगणारे गड-किल्ले यांची प्रतिकृती साकारत असतात. घरातील तसेच शहरातील लहान मुलांना आपल्या गड-किल्यांच्या इतिहासाची माहिती मिळावी, या उद्देशाने हे किल्यांची निर्मिती करत असतात. मागील वर्षी चव्हाण परिवाराकडून प्रतापगड किल्याची सुंदर प्रतिकृती साकारण्यात आली होती. यंदाच्या वर्षी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले ‘रायगडाची’ प्रतिकृतीची निर्मिती केली आहे. यामध्ये श्री तुळजाभवानी मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज समाधी, श्री जगदीश्वर मंदिर, नगारखाना, बाजारपेठ, गंगासागर तलाव, हिरकणी बुरुज, टकमक टोक अशी रायगडावरील महत्वाची ठिकाणे दाखवण्यात आली आहे.
गड निर्मिती करण्यासाठी दगड, माती, विटा, पोते आदी प्रकारच्या पर्यावरण पुरक वस्तुंचा वापर करण्यात आलेला असुन किल्ला बनवण्यासाठी शिवराज चव्हाण, श्रावणी चव्हाण, सेजल चव्हाण, आराध्य चव्हाण, रीतिक चव्हाण, आदित्य चव्हाण, वेदांत निकम आदींनी परिश्रम घेतले.