नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या चुरशीच्या निवडणुकीत नांदगाव मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचे मत अवैध ठरविण्यात आले होते. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देत शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर केंद्रीय निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला असून कांदे यांनी रिट याचिका दाखल केली आहे; मात्र त्यांनी निवडणूक याचिका दाखल करायला हवी, असे आयोगाच्यावतीने ॲड. अभिनव चंद्रचूड यांनी न्या. एस. व्ही. गंगापूरवाला व न्या. धीरज सिंह ठाकूर यांच्या खंडपीठाला सांगितले. त्यावर न्यायालयाने यासंदर्भातील युक्तिवाद २४ जूनला ऐकू, असे म्हणत याचिकेवरील सुनावणी तहकूब केली.
निवडणूक आयोगाने आपले मत अवैध असल्याचे जाहीर केल्याने आपल्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल रद्द करावा, अशी मागणी कांदे यांनी याचिकेद्वारे केली आहे.











