मंगळवारी रात्री राज्यातील भाजपच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर आता राजकीय पटलावर घडामोडींना वेग आला असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. राज्यपालांनी विधीमंडळ सचिवांनाही पत्र पाठवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सुप्रीम कोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे. सरकारला 30 जून रोजी बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आज या सत्तासंघर्षाचा नववा दिवस आहे. मंगळवारी, भाजपच्या गोटातून मोठ्या घडामोडी घडल्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली भाजप श्रेष्ठींची भेट घेतल्यानंतर रात्री मुंबईत राज्यपालांची त्यांनी भेट घेतली. सरकारने बहुमत गमावले असल्याचा दावा त्यांनी केला.











