मुंबई, दि. ०७ऑगस्ट, २०२२:- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर विविध उपक्रम राबविले जात आहेत. संपूर्ण देश ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला साथ देत आहे. यामधे महावितरणही मागे नाही. महावितरणने ऑगस्ट महिन्यातील सर्व वीजबिलांवर ‘हर घर तिरंगा’चे स्टीकर्स चिकटवून प्रत्येक घरात तिरंगा पोहोचविला आहे.
मुंबईतला काही भाग वगळला तर चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक घरात महावितरणची वीज आहे. त्यामुळे एक प्रकारे प्रत्येक घरात तिरंगा पोहोचविण्याचे कार्य महावितरणने केले आहे.
जुलै अखेर राज्यात महावितरणचे एकूण 2 कोटी 88 लाख 28 हजाराहून अधिक ग्राहक आहेत. यामध्ये घरगुती 2 कोटी 15 लाख 43 हजार, वाणिज्यिक 20 लाख 56 हजार, औद्योगिक 3 लाख 96 हजार, शेतीपंपाचे 44 लाख 25 हजार याशिवाय उर्वरीत इतरही ग्राहकांचा समावेश आहे. वीज व विजेचे बील कुटुंबाचा एक अविभाज्य भाग आहे. अनेक घरात वीजबिल फाईल संग्रही असतेच. त्यामुळे महसूली पुरावा म्हणून ग्राह्य नसतानाही अनेक संस्था एखाद्याला मालमत्तेचा पुरावा म्हणून लाईटबिल मागतात. विजेचा दरमहा युनीटमधील वापर कुटुंबाचा आर्थिक स्तरसुद्धा ठरवत असते.
प्रत्येक घराघरांत तिरंगा पोहोचविण्यासाठी वीजबिल हे अतिशय उत्तम माध्यम असल्यामूळे या संदर्भातील निर्देश केंद्राकडून प्राप्त झाले. त्यानुसार महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी तातडीने पाऊले उचलत सर्व वीजबिलांवर तिरंगा लावण्यासंदर्भात निर्देशित केले. अन् अवघ्या काही दिवसांत प्रत्येक भागातील ‘बिलींग सायकल’नुसार वीज बिलाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरी तिरंगा पोहोचविण्याचे काम महावितरणने केले आहे. वीजबिलावरील तिरंगा बघून भविष्यात प्रत्येकाची अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाची आठवण नक्कीच ताजी होईल.











