मनमाड शहरातील नागरिकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत असून मुलभूत सुविधांचा अभाव व समस्यांबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने नगरपालिका प्रशासनाला शहरातील समस्यांबाबत वेळोवेळी निदर्शनास आणून दिली तरीही प्रशासनाने काही एक कार्यवाही केलेली नसल्याने सोमवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ .३० वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
मनमाड शहर हे नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर आहे. मात्र नगरपालिका प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे व दुर्लक्षामुळे शहराची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. मनमाड नगरपरिषद सामान्य मनमाडकरांना मुलभूत सुविधा देण्यास कमी पडत असल्याने सामान्य जनतेमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या पावसाळा असून देखील शहराला मिळणाऱ्या पाण्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. मनमाडकरांना सुमारे २२ दिवसानंतर मिळणारे पिण्याचे पाणी योग्य फिल्टरेशन होत नसल्याने अत्यंत दुषीत व निष्कृष्ट दर्जाचे असल्याने संपूर्ण शहरामध्ये पिण्याच्या पाण्यामुळे होणार्या साथीच्या रोगांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून उलट्या, जुलाब आदी आजारांमुळे नागरिक बेजार झाले आहे या सर्व भयानक परिस्थितीस सर्वस्वी नगरपालिका पाणीपुरवठा विभागाचा निष्काळजीपणा व बेजबाबदारपणा आहे. नियमितपणे पाणीपट्टी भरून देखील आम्हाला मनमाड नगरपालिका स्वच्छ पाणीपुरवठा करण्यास सक्षम नसल्याने स्थानिक नागरिक अत्यंत संतापलेले आहेत. मनमाड शहरात विविध भागांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले आहे, अनेक
स्ट्रीट लाईट बंद स्वरुपात आहेत तसेच चंद्रभागा लॉन्स ते भगवान बाल्मिकी स्टेडियम
पर्यंत फक्त दाखवण्यापुरते वीजेचे खांब उभारण्यात आले आहे मात्र त्या खांबावर
आजपर्यंत स्ट्रीटलाईट लावण्यात आलेले नाही त्यामुळे सदर परिसरात मोठ्या प्रमाणावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. सध्या दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे बेरोजगारी वाढल्याने शहरामध्ये चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यामुळे सदर परिसरात अंधाराचा गैरफायदा घेवून कोणत्याही प्रकारचा गुन्हेगारी स्वरुपाचा अनुचित प्रकार घडल्यास त्यास सर्वस्वी मनमाड नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहील असे ही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मनमाड शहरातील सर्व गटारांची वेळच्या वेळी साफसफाई केली जात नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे डासांचे प्रमाणही मोठया प्रमाणात वाढले आहे मनमाड नगरपरिषदेतील आरोग्य विभाग व मलेरिया विभागाच्या दुर्लक्षामुळे तसेच नियमितपणे औषध फवारणी होत नसल्याने शहरातील सामान्य जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे.
वरील सर्व बाबींचा संदर्भानुसार मनमाड नगरपालिका प्रशासनाला लेखी पत्र देवूनही नगरपालिकेने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही त्यामुळे नाईलाजास्तव सर्व नागरिकांना सोबत घेवून मनमाड नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
निवेदनावर गणेश धात्रक, सह संपर्क प्रमुख प्रवीण नाईक, उप जिल्हा प्रमुख संतोष बळीद,
दिनेश केकान, माधव शेलार, लियाकत शेख,खालिद शेख, वाल्मीक धात्रक,संजय कटारिया, कैलास भाबड किशोर कदम, अनिल दराडे, संतोष गुप्ता, प्रवीण सूर्यवंशी, संतोष जगताप,आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.











