अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालन्यातील अंतरावाली सराटी गावात जाऊन मराठा आंदोलक जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. राज्य सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यास सदैव प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जरांगे यांना सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. तब्बल १७ दिवसांनी मनोज जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. मुख्यमंत्र्याच्या हातून ज्यूस पिऊन मनोज जरांगे पाटील यांनी अखेर उपोषण सोडले आहे.मराठा समाजाला आरक्षण तसेच कुणबी प्रमाणपत्र मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या १७ दिवसांपासून जालन्यातील अंतरवाली सराटी गावात उपोषण करत आहेत. मराठा समाजाला जोपर्यंत सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही, सरकार तसा जीआर काढत नाही, तोपर्यंत आमचं उपोषण सुरू राहणार अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली होती.
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी ११ वाजता जालन्यात जाऊन जरांगे यांची भेट घेतली. यावेळी राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास तत्पर असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे पाटील यांना दिले. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले.









