मंगळवारी पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांना शिंदे फडणवीस सरकारने मोठा दिलासा दिला. ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरताना सर्व्हर डाऊन असल्याने उमेदवारांना तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यानंतर आता पोलीस भरतीचा अर्ज दाखल करण्यासाठी तब्बल 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.
या पोलीस भरतीला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. राज्यभरातील 18 हजार पदांसाठी मंगळवापर्यंत 12,5000 लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. तर मुंबईत सात हजार पदांसाठी चार लाख 29 हजार अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
वाढत्या बेरोजगारीमुळे या भरतीसाठी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर एवढी मोठी भरती आल्याने मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत. शासनातर्फे 18 हजार 331 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. मंगळवार पर्यंत राज्यभरातून 12 लाख 25 हजार उमेदवारांनी अर्ज केले आहे. तर त्यातील 1,500000 अर्जदारांनी शुल्क भरले नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे प्रत्येक पदासाठी सरासरी 67 उमेदवारांनी अर्ज केला आहे.या पदासाठी बारावीपर्यंत शिक्षणाची अट असल्याने सुमारे 14 लाख अर्ज येणे अपेक्षित असल्याचे अधिकाऱ्यानी म्हटले आहे. मात्र अर्ज करणारे जवळपास 55 टक्के उमेदवार पदवीधर असल्याचे समोर आले आहे.
15 डिसेंबर पर्यंत अर्ज भरू शकता
ऑनलाईन अर्ज भरण्यात अडचणी येत असल्याने पोलीस भरतीचे अर्ज भरण्याची तारीख 15 दिवसांनी वाढवली आहे. त्यामुळे आता 15 डिसेंबर पर्यंत पोलीस भरतीसाठी अर्ज भरता येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.













