आगामी टी 20 विश्वचषक स्पर्धेनंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आपले कर्णधारपद सोडणार असल्याची चर्चा सुरु आहे. येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी 20 विश्वचषकानंतर विराट कोहलीने टी 20 आणि एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. त्याच्या ठिकाणी रोहित शर्माची वर्णी लागण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. कसोटी संघाचे नेतृत्व मात्र विराटने आपल्याकडेच ठेवण्याचं ठरवलं असल्याचीही माहिती आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या एका वृत्तानुसार, विराटच्या जागी रोहित शर्माकडे टी 20 आणि एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा दिली जाऊ शकते. गेल्या काही दिवसांत विराट कोहलीने या विषयावर संघ व्यवस्थापन आणि रोहित शर्मासोबत अनेकदा चर्चा केल्याची माहिती आहे. विराट कोहलीला जगातल्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक समजलं जातं. विराटने आपल्या फलंदाजीवर लक्ष्य केंद्रीत करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
विराट कोहलीकडे तीनही प्रकारचे कर्णधारपद असल्याने त्याचा परिणाम फलंदाजीवर होताना दिसत आहे. त्यामुळे त्याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला तर ते त्याच्या फलंदाजीसाठी चांगलं असेल असं मत काही जाणकारांनी व्यक्त केलं आहे.
रोहित शर्मा सध्या तीनही प्रकाराच चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तसेच रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएलचा चषक जिंकला आहे. व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये त्याला जगातला सर्वोत्तम ओपनर समजलं जातं. त्यामुळेच त्याच्याकडे कर्णधारपदाची धुरा देण्यासाठी ही योग्य वेळ आहे असं बीसीसीआयच्या सूत्रांचं मत आहे.












